Saturday, November 3, 2007

व्हाट अ वूमन वान्ट?

असं लिहायसारखं काही नाही. पण म्हटलं उगाच काहितरी भरकटत खरडण्यापेक्षा एखादा सांगण्यासारखा आठवणीचा प्रसंग निवडावा. आणि मग "अ" आठवणीचा तसा "अ" अथर्वचा. म्हणून म्हटलं त्याचाच एक गोड प्रसंग लिहावा. अगदी थोडक्यात.

आता "What a Woman Want?" या प्रश्नावर प्रत्येकाची आपापली मतं तयार झाली असतील ... आणि बऱ्याच जणाची (म्हणजे जवळपास सर्वांची) मतं अगदी एकसारखी असतील. आरे जो प्रश्न आजवर प्रत्येक पुरूषाला छळंत आलाय त्या विषयाला हात घालायचा म्हणजे अगदी तरण्या नागाच्या फ़ण्यावर हात ठेवल्यासारखं आहे. पण अगदी प्रामाणीकपणे सांगतो ... माझ्या ढोपरात नाही तेवढा दम ... लग्न केलं हेच खूप झालं .. त्या नंतर "बोलणे" हा प्रकार काय असतो हे ठावूकच नाही आणि तोंडाचा उपयोग फ़क्त (दिलं ते) खाण्यासाठी असतो एवढच ठावूक. (आणि म्हणूनच की काय मला ही ब्लॉगायची सवय लागली ... उगीच मनाचा आपला दुधाची तहान ताकावर भागवायचा कयास)

हिवाळा म्हटलं की एका जागी बसून बुडं गरम करण्या पलिकडं काही काम नसतं. आजुबाजुची टवाळ टाळकी जमा करायची आणि रात्री जागून काढायच्या. एखादा पिक्चर (संवेदच्या भाषेत भंपी), किंवा पत्ते, किंवा अशाच रंगतदार गप्पा .... आणि मग सगळ्या शादीशुदा लोकांच्या रंगतदार गप्पा त्या कशावर असणार ... बरोबर ओळखलंत "बायको" .. अगदी म्हणजे आमच्या सगळ्यां बायकांचा देखील (प्रत्येकी एक बायको ... उगीच "आमच्या सगळ्या बायका" या वरनं गैरसमज नको व्हायला. इथं काही "समज"लं तर ताप होतो ... "गैरसमज"लं तर वाटच लागायची).

तर मागल्या शुक्रवारी असेच आम्ही काथ्या कुटत बसलेलो ... आणि हळूहळू विषय घसरला "पोरींना काय आवडतं". हो घसरलाच ... कारण स्वत: होवून तर एखादा लग्न झालेला नवरा प्राणी अश्या "जीवघेणा" विषयाला हात घालणार नाही. आता विषय सुरू झाला म्हणजे पुढे काय चालू असेल ते काही मी इथं सविस्तर लिहायची गरज नाही. सर्वांना ठावूक असेलच ... आणि ज्यांना ठावूक नसेल त्यांच्यासाठी २ पर्याय ... एक तर गुगल करा .. नाहीतर लग्न करा. शेवटी अनुभव हा सगळ्यात मोठा गुरू, अगदी गुगलपेक्षाही. तेंव्हा पर्याय २ योग्य .... "योग्य?" .. हंsssss

तेवढ्यात ... बाजुला बसून काहितरी खटाटोप करणाऱ्या माझ्या अमेरिकन (इथं "अमेरिकन" हा उल्लेख त्याच्या नागरिकत्वाबद्दल नाही ....तर त्याच्या विचारसरणी बद्दल) पोरानं मधेच उडी टाकली ... आणि अगदी कॉन्फ़िडॆंटली सांगीतलं ... "I know ... they like dogs."

झालं ... अगदी आणिबाणी लागावी अशा स्तराला पोचलेलं आमचं डिस्कशन विनोदयात्रेत जावून पोचलं. बट ही इज सो राईट ... "they like dogs"

**************************************

प्रामाणिक खुलासा: या पोस्टमागे स्त्रीवर्गाला किंवा कुत्रा या स्वजातीयाला दुखावण्याचा यत्किंचीतही उद्देश नाहीये. तेंव्हा उगाच "गैरसमज" करून घेवू नयेत. स्त्रीवर्ग आणि कुत्रा या दोन्हीबद्दल मला अमाप आदर आहे, माझं स्वतःवर अफ़ाट प्रेम आहे आणि जगण्याची इच्छा आणखी शाबूत आहे. तेंव्हा नेहमीच्या सवयीनुसार (स्त्रीवर्गाने) हा पोस्ट पर्सनली घेवून गैरसमजाला बळी जावून (माझा) बळी पाडू नये.

Saturday, October 27, 2007

Frank-ly स्पिकींग

Frank .. एक टिपीकल आयटम. Every Body Loves Raymond (EBLR) मधल्या Ray चा बाप. पण हा माणूस 'जे बोलतो, जेंव्हा बोलतो आणि ज्या पद्धतीनं बोलतो' ... ते ऐकून तर सोडा, नुसतं बघुनच हसू येतं ... at times इतकं .... की हसू की रडू तेही कळंत नाही. आणि म्हणून this is one of the reasons why EBLR is one of my very favorite shows.

"Cut the Crap" ... एक नेहमीचा response... कुठल्याशा प्रश्नाला उत्तर द्यायचं नसेल तर हे वाक्य फ़ेकून मोकळा. "Crap" हा त्याचा आवडता शब्द. चार अक्षरी F शब्द ज्या सर्रासपणे वापरला जातो तसा हा त्याच्यासाठी ... "Crap"

"Dad, I want to spend time with Kids. It is important and good ... and ... ", Ray
"Cut the crap.", Frank

"Frank, dont you think you have never encouraged Ray, or Robert for that matter, to do what he or they always wanted to do", Deb
"Cut the crap ... "

"Do you ever cared for my love and care for you Frank ... in all these 45 years of our marriage ...", Murry
"Cut the crap .. where is my lunch"

"Dad, I am a sargent, not a police man", Robert
"Cut the crap ... and GIVE ME THE REMOTE"

"Dad, you really did not want me to take piano lessons, did you? That is why you always made me play T-ball, isn't it?", Ray
"For the sake of the holy god .." ... wait ... गॉड म्हणॆल तो frank कसला .. हंsss "for the sake of holy crap ... what kind of question is that?" ..

holy crap? now what is that ... पण शेवटी तो Frank ... holy crap नाहीतर आणखी काय म्हणेल.

आणि हो "I was in Korea" this is another catch phrase .. catch phrase म्हणजे जेंव्हा जेंव्हा frank हा प्राणी अडचणीत सापडतो आणि इतराची अडचण ही त्याच्या त्यावेळच्या गरजेपेक्षा (म्हणजे ब्रेड किंवा रिमोट किंवा टिव्ही आणि असंच काही तरी चिल्लर) मोठी ठरायला लागते, तेंव्हा त्याचं एकच दुःख्ख ... एक instanteneous "I was in Korea" .... Well he was. अमेरिकन आर्मीमधे असताना तो कधीतरी कोरीयात युद्धावर होता. आणि ते दुःख्ख आणि तो त्रास जगातल्या कुठल्याही त्रासापेक्षा नेहमीच सरस असा त्याचा भ्रम ... किंवा विश्वास म्हणा! आणि मग तुमची फ़ालतू कारणं गुंडाळून सुरळी करा आणि घाला ... मला माझी "गरज" पुर्ण करून द्या ... व्हा बाजुला ... झालं!

*********

असे कितीतरी Frank आपण नेहमी पहातो. मी पाहिलेत. आपलं एखादं दुःख्ख अशी ढाल करून जगणारे, अशा कारणाची ढाल पुढे करून एक sympathy wall तयार करून स्वतःला कुरवाळणारे Frank, आपल्या कुटूंबावर प्रेम करून देखील अगदी अनोळखीपणे वागणारे Frank, आपल्या प्रत्येक कृत्यावर इतरांना हसवणारे आणि कितीही वेडगळ किंवा विक्षीप्त वागताना इतरांबद्दल मनात अपार प्रेम जपणारे Frank ...प्रत्येक वेळी एका नव्या पोषाखात .. पण प्रत्येकवेळी तेवढ्याच ओळखीचे आणि आवडीचे.

तुम्हाला भेटलेत का कोणी असे?

Thursday, October 11, 2007

रामण्णाचं पुण्य!!!

"आरं ए गनप्या. ते कोंबडं पळालं बघ. धर तेला. सांच्यासाठी धाडलंय परश्यानं. गेलं पळून तर रातच्याला परेशानी हुईल ... पळ पळ बिगी." सकाळी सकाळी बिडी शिलगावत रामाण्णानं हाक दिली. आज कामावर जायचं नसल्यानं सगळंच कसं निवांत चालू होतं. उठू उठू म्हणंत चांगलंच उजाडलं होतं. पण रामाण्णाला मात्र उठवत नव्हतं. रात्रभर शांतेन झोपू दिलं नव्हतं. ती गेल्यापासनं नाहीतरी तो जरा थंडावलाच होता.


रामाण्णा म्हणजे गावातला हरकाम्या माणूस. शांत बसणं हे त्याच्या खाक्यात नव्हतंच. बापदादांकडून वडिलोपार्जीत आल्या सारखा हा गुण त्यानं चांगलाच जोपासला होता. वेळ मिळाला की काहीबाही करत रहायचं हेच त्याला ठावूक. दिवसभर दामाजीच्या शेतात राबून घरी परतलं की शांतीच्या हातचं गरम गरम खायचं आणि मग चावडीवरच्या टवाळ मंडळीला नमस्कार टाकून कसल्या ना कसल्या उद्योगाला लागायचं हेच रोजचं जीणं. मग कधी कुणाला मदत लागली तर सगळे कसे हक्कानं म्हणायचे, "बिनघोरी बगा. रामाण्णा हाय की हातभार लावायला". मग कुणाचं खळं बडवणं असो नाहीतर रंभाच्या म्हशीचं दुखणं असो, कुंदीच्या सासरवाडीचं गाऱ्हाणं असो किंवा रखमा आजीची देवपुजा. रामाण्णा सगळं कसं जातीनं करायचा. परश्याच्या पोरीच्या, जनाच्या, लग्नात एकट्यानं सगळ्या वरातीची सोय बघीतली होती. कुणाला काही कमी पडू दिलं नाही. काय झक्कास व्यवस्था केली होती .. जणू काय त्याचीच पोरगी होती ती.


नाही म्हटलं तरी जना त्याला आबाच म्हणायची. गावातल्या शेंबड्यापोरासकट थोर म्हाताऱ्यांचा "रामाण्णा" जनाचा मात्र "आबा" होता. आणि त्याला ही ते आवडायचं. लहानपणापासनं आबा आला की जना खुललेली असायची, त्याच्याच भोवती फ़िरत रहायची. रामाण्णापण परश्याकडं निघाला की खिशात चने, गोळ्या किंवा एखादं बिस्कीट असं काहीबाही हमखास ठेवायचा. कधी विसरलं तर हिरमुसलेली जना त्याला पहावायची नाही. बऱ्याचदा तर परश्यानं हाकलल्या शिवाय ती त्याला सोडायचीच नाही. "जने, जा की बाहेर खेळ नायतर तुझ्या माईला काय मदत पायजे का बघ. च्या करायला सांग आन घेवून ये". जना गेल्या शिवाय परश्या आणि रामाण्णाला बोलायला भेटायचं नाही. पण जना गेली की एक विचीत्र पोकळपणा रामाण्णाला जाणावायचा. आणि मग अस्वस्थ होवून कधी कधी तोच म्हणायचा "अरं बसू दे की. उगाच का खवीस खातूस तीच्यावर".


रामाण्णाचं हे देवासारखं वागणं शांतेला मात्र पटायचं नाही. तीनं कितीतरी वेळा त्याला बोलून दाखवलं असेल "अवं असं रामावनी नाका ऱ्हावू. लोकं काय तुमी चांगले म्हणून न्हाई बोलवत तुमाला. उगं काम कराया फ़ुकट हात मिळत्यात म्हणून रामाण्णा रामाण्णा करत्यात." तीला वाटायचं आपला नवरा इतका थकून येतो, मग जरा शांत बसावं, आपल्याला जवळ घ्यावं, बोलावं, आणि बरच काही. नाही म्हटलं तरी तीला नवऱ्याशिवाय होतंच कोण. महामारीत माय बाप गेले. आणि मग मावस की चुलत की मावस-चुलत अशा कुठल्या मामानं सांभाळला तीला. वयात आली तशी गावतल्या पाटलामार्फ़त रामाण्णाला गाठला आणि दिली हवाली करून. लग्नानंतर कुठल्याश्या कारणावरून गावात उठलेल्या वादळात, तो होता नव्हता तेवढा मामापण गेला. आणि शांती सारं माहेर हरवून बसली. तेंव्हापासनं रामाण्णा हेच सर्वस्व होतं तीचं. लग्न करून आली तेंव्हा शांतीला पाहून कितीतरी जणांना "रामाण्णाचं हे मागल्या जन्माचं पुण्य आहे" असंच वाटलं. तसं म्हटलं तर रामाण्णा या जन्मात पण काही कमी ’पुण्य’ करत नव्हता. रखमा आजीनं तर शांतीला नजर लागू नये म्हणून गावाबाहेरच्या भैरवाची पुजा केली होती. पण भैरवाच्या मनात काहीतरी निराळच होतं.

एक दिवस रखमा आजी सोबत भैरवाच्या दर्शनाहून परतताना शांतीनं रामाण्णाला पाहीलं. गडबडीत कुठतरी निघालेल्या रामाण्णाला आवाज द्यायच्या आधीच तो घाम पुसंत नजरेआड झालेला. शांतीच्या मनात चलबिचल झाली. आणि त्या रात्री झोपताना शांतीनं खोलात जावून त्याला विचारायचा प्रयत्न केला. पण "सांगतो नंतर कधी तरी" म्हणत रामाण्णानं विषय टाळला होता. दिवस उलटले. सगळं कसं आपसुकच निवांत झालं. पण वरवर शांत वाटणाऱ्या शांतीच्या मनातून काही तो दिवस जाईना. तेंव्हा एक दिवस तीनं हटकून रामाण्णा जवळ तो विषय काढला, " अवं, एक इचारायचं व्हतं". "हं" म्हणत रामाण्णानं कूस बदलली. "तवा तुमी गरबडीत कुटं गेला व्हता हे सांगीतलं न्हाई कदी ... म्या म्हणते असं लपवायसारखं ....." पुढलं काही ऐकायच्या आधी रामाण्णा उठून पायात चपला घालून बाहेर पडला होता. त्याला तो विषयच मुळी नको होता. पण परिणामी शांतीला अधिकच उत्सुकता लागून राहीली. पण रामाण्णाला असं रागात आणायला तीला आवडायचं नाही. नाही म्हणायला, तीला तो एकटाच होता. तो गेला की सगळं घर तीला खायला उठायचं. म्हणून मग तीनं तो विषय मनातनं काढून टाकयचं ठरवलं.


पण नशीबाचा फ़ेरा कुणाला चुकलाय का? एक दिवस रानातून घरी परतताना शांतीनं रामाण्णाला परश्याच्या गोठ्याकडं जाताना पाहीलं. हातात कसली तरी पिशवी घेवून अगदी आनंदात तो निघाला होता. त्याला आवाज द्यावा म्हणून शांतीनं तोंड उघडलं, तर गोठ्याच्या दारात परश्याची बायली उभी होती. आत जाताना तीनं रामाण्णाचा हात धरलेला शांतीनं पाहीला. आणि आभाळ कोसळल्यासारखं ती झपक़्अन खाली बसली. जरा शुद्ध आली तेंव्हा पटापट परश्याच्या गोठ्याकडं गेली आणि गोठ्याच्या भिंतीला कान देवून ऐकू लागली. रामाण्णाचा एक एक शब्द तीच्या मनाला कापत होता. "करू कायतरी शांतीच. तू नगस उगच ईचार करू. म्या बगतो काय करायचं ते. तीला न्हाई कळनार काई. आजपस्तोर कधी कळलंय का? आणि ती न्हाई माज्यावर शंका धरायची. तू फ़कस्त परश्याला सांबाळ. चल. निघतो म्या. तेवडं कापड मातर आपल्या जनीला दे. इसरू नगस. माजी पोरगी हाय ती ... तीला कायबी कमी पडू देवू नगस". ऐकून शांतीला घेरी आली. काहीतरी पडल्याचा आवाज आला म्हणून परश्याची बायली आणि रामाण्णा मागे आले. बेशुद्धावस्थेतली शांती पाहून दोघांची शुद्द हरपली.


डोळ्यावरली सूज आवरत रामाण्णा गणाप्याकडं पहात होता. "मालक, हेला इथं टोपलीखाली ठिवतो. न्हाईतर जायचं पुना पळून". पण उघड्याडोळ्यानी गणप्याकडं बघणाऱ्या रामाण्णाला मात्र रात्रच सरत नव्हती. रात्रभर शांतीनं त्याला झोपू दिलं नव्हतं. "सोड मला मुडद्या. तुला असले चाळे कराया लाज न्हाई वाटली. म्या काय पाप केलं म्हणून ह्या अवदसेसंगट संसार मांडलास." आणि चिंचेखालच्या विहीरीत बुडताबुडता ती शाप देवून गेली ... "देव बघून घेईल तुला ... कधी सुखानं झोपू देनार नाय ... जगू देनार नाय .. जगू देनार नाय". सुजावलेले डोळ्यानं रामाण्णा कोंबडीकडं बघत होता आणि शांतीचा आक्रोश ऐकत होता.

Thursday, September 6, 2007

मन वढाय वढाय ... हो ४ वर्षाचं सुद्धा

"Daddu, can spider man die?" एक अतीगंभीर प्रश्न अथर्वने विचारला. तुम्हा आम्हाला त्या प्रश्नाचं काही वाटणार नाही कदाचीत. पण त्या ४ वर्षाच्या मनाला ती कल्पना किती जखमी असेल याची कल्पना आपणाला करता येणार नाही. शेवटी काही झालं तरी स्पायडर मॅन त्याचा सुपर हिरो. well, "हे सगळं इथं मांडायचं कारण?" सांगतो. या साध्यासुध्या वाटणाऱ्या प्रश्नाचा आणि त्यानंतरच्या आमच्या संभाषणाचा समारोप अगदी अनपेक्षीत झाला.

मन, मग ते कितीही कोवळं का असेना, विचार करणं हे त्याचं काम. माशाला पोहायला किंवा वासराला दुध प्यायला शिकवायला लागत नाही. भुक लागली की खाणं आणि थकलं की जांभई देणं, दुखलं की रडणं आणि सुखलं की हसणं, हे जितकं नैसर्गीक अगदी तितकच नैसर्गीक म्हणजे मनाचं विचार करणं. मग त्याला वय किंवा कशाची अट नाही.

दिवसागणीक अथर्व वाढतोय. आणि वाढत्या वयाबरोबर आचार विचार वाढताहेत. रोज नवीन काहीतरी शिकणे आणि मग आचरणात आणणे हाच तो काय त्याचा एक्सपिरीअन्स. आणि या एक्सपिरीअन्सपायी तो कोण कोण प्रश्न विचारतो. मागच्याच ब्लॉगमधे मी त्याचे काही पराक्रम वर्णन केले. पण "त्यांना काय कळतं" या एका विचाराखाली आपण कितीतरी वेळा या बाल मनाच्या आशा, आकांक्षा, विचार आणि भावना दाबून टाकतो. पण अखेर जssराss विचार केला तर असं पटायला लागतं की त्या बाल मनात देखील अगदी तेच चालतं जे आपल्या so called जाणत्या मनात चालू असतं.

शेवटी भावना ती भावनाच. लहान पोरगा म्हणा किंवा एखादा जख्ख म्हातारा म्हणा. आणि मृत्यू सारखं सत्य अगदी प्रत्येकाला भयावहच वाटतं.

ऑगष्ट २४. मी, विजू आणि बाळराजे मंदिरात निघालो होतो. माझा ३२वा वाढदिवस, म्हटलं जरा देवापुढे डोकं टेकावं आणि पुढल्या आयुष्याची भीक मागावी. माझा वाढदिवस आहे हे कळाल्या पासून साहेबांनी कमीत कमी शंभरवेळा तरी मी किती म्हातारा झालो याची आठवण करून दिली असेल मला. असॊ. तर मी गाडी चालवत चालवत विजूशी कसल्यातरी विषयावर बोलत होतो. आणि अथर्व आपल्या कार सीट मधून दोन बोटे वाकडी करून माझ्याअंगावर स्पायडर-वेब टाकत होत. आणि मधेच "excuse me
daddu, can spider man die? Pranav says he does and I say no." बहुतेक प्रणव सोबत कसली तरी पैज लागली असेल. आता प्रणव पडला ६ वर्षाचा, म्हणजे २ उन्हाळे जास्ती पाहिलेले, पब्लिकस्कूल मधे जाणारा आणि अमेरिकेत राहिल्यानं स्वतंत्र विचार करायची सवय. म्हणून तो अगदी ठाम होता "Yes, Spider man dies". कधी, कसा, का, कुठे, केंव्हा .. कशाचा पत्ता नाही ... पण "yes, he dies" हे नक्की. आणि ते सारं अचानक आठवून अथर्वचा मला हा प्रश्न. मी थोडा विचार करून म्हटलं "हो". ४ वर्षाचा म्हटल्यावर त्याला आयुष्याचं सत्य सांगाणं हा माझा बापधर्म! पण म्हटल आपल्या पोराचा सुपर हिरो. उगीच हो म्हणून त्याला एक "common man" कशाला बनवा. म्हणून थोडं स्पष्टीकरण देत म्हणालो,
"You know. He saves lots of people and slowly he gets tired and grows old. When things get old, they become weak. Like you see that tree, it is growing big. And slowly it will grow old and weak and then it will die." म्हटलं पिल्ल्याला लक्षात आलं असेल मला काय म्हणायचंय. पण त्या नंतर जे झालं, देवा शपथ सांगतो, थरथरायला झालं.

माझ्या उत्तरावर "ओह" अशी प्रतिक्रीया देवून तो परत त्याच्या virtual web सोबत खेळता झाला. आणि परत एकदा उचकी लागल्यागत एकदम बोलला. "Daddu, so you are also growing old ... so you will also .." आणि पुढले शब्द त्याला उच्चारावेसेच नाही वाटले. "so you will also .... आवंढा .... I don't want to say it" असं म्हणून शांत झाला. मग कसलं वेब नाही की प्रश्न नाही. बापावीना आयुष्य काय असेल हे त्याला कदाचीत पहावलं नसेल. पोरका पोरगा म्हणून पुढे जे काही असेल ते कदाचीत त्याला जाणवलं असेल आणि नकोसं झालं असेल. पण एक मात्र खरं. त्याच्या विचारशक्तीकडं बघून मला जो कौतुकास्पद अभिमान वाटला तो इथं प्रकट करणं शक्य नाही. गळा दाटून आला आणि म्हटलं, एव्हाना मी "आय लव्ह यू" म्हटलं की "आय डोन्ट लव्ह यू, आय ओन्ली लव्ह ममा" म्हणत हसणारं चिमुरडं हे, इतका विचार करायला लागलं. मग हळूच गाडी बाजूला घेतली आणि त्याला म्हणालो, "बेटा, don't worry. I am not going to go anywhere. Mr God loves you a lot and he will take care of you."

मंदिरात पोचलो. आणि मग स्वतःसाठी काही मागायचं भानच कुणाला होतं. डोळे मिटले आणि त्या दगडाला म्हणालो, "बाबा रे, माझ्या सगळ्या इच्छा सोड. पण याच्या पूर्ण कर."

शेवटी मागल्या ब्लॉगच्या कमेंटमधे संवेदने म्हटल्यासारख "ही पोरं कधी कशी प्राण गळ्याशी आणतील हे सांगता येत नाही" किंवा "कधी प्राण कंठाशी आणतील" असं म्हणू का मी. तसं गळ्याशी काय किंवा कंठाशी काय, अर्थ एकच, पण बहुतेक भावना थोडीशी वेगळी. नाहीका!!

Friday, August 10, 2007

Let your work speak for you

२० वर्ष ... हो जवळपास २० वर्ष झाली हे लाकूड हातात घेवून मी इथं मैदानात उतरलो. त्या पहिल्यादिवसापासनं आजपर्यंत हा घणाणती टोला असाच आहे. आला चेंडू की दे दणका ... शाब्बास पठ्ठे. कुणाला पटो की ना पटो .. आवडो की ना आवडो ... आपल्याला भारी आवडतं. आजवर जे काही केलंय आणि करत राहीन. मला जोवर सार्थ अभिमान असेल, तोवर हे असच चालणार. तुम्हाला नाही ना पटंत ... मग निघा ना आपल्या वाटे. मी का तुम्हाला निमंत्रण दिलय की "यारे बाबांनो .. मी खेळतोय तर जरा बघायला या." आरे जा ना! ही बॅट पकडली तेंव्हा काय मला तुम्ही सांगितलं होतं ... "हे बघ सच्या, हा शॉर्ट बॉल आला ना की हा असा खेळायचा ... आणि ती फ़ुल्लीश डिलीवरी आली ना की ही अशी द्यायची ..." मग आज का सगळे जण असे उलटतपासणी असल्यागत माझ्या प्रत्येक शॉट वर कॅमेरा लावून बसलेत. आरे मी खेळतो, एन्जॊय करतो, तुम्ही ही करा ना. ११ गावची ११ पोरं आम्ही ... कशी एकत्र येवून आपल्या देशासाठी खेळतो, तुमच्या आणि माझ्या आनंदादाखल खेळतॊ. मग सपोर्ट करा ना. की तुमचा सपोर्ट असाच बुजळा ... जिकलॊ की आम्ही तुमचे "हिरोज इन ब्लू" आणि नाही जमलं कधी तर अगदी गल्लीगल्लीत आमच्या नावाच्या बोंबा.

कोण रे ते? कोण म्हणाला की "मी आजकाल दणके देत नाही"? आरे मानला .. दणके कमी झाले असतील ... पण म्हणून काय मी कुचकामी झालो, दुबळा झालो. आरे तोंड उघडायच्या आधी जरा ऍनालिसीस तरी करायचं ... थोडीशी कारण मिमांसा केली असती तर असे नसता ओकला. २० वर्ष तुम्हा लोकांना रिझवलं ते का असंच fluke होतं. वयासोबत आणि अनुभवासोबत न बदलणारा तो माणूसच कसला? ’नवं शिका आणि जुनं सुधारा’ हाच आपला गुरूमंत्र. मग एक सिनीअर प्लेयर म्हणून थोडं शांत व्हायला नको? की आजही तेच करू ... आला चेंडू की दे दणका. साला, तेंव्हा दणका देतादेता आऊट झालो तर तुम्हीच सगळे "चु चु चु" करायचे ... पस्तावायचे ... म्हणायचे "यार सच्या नको आऊट व्हायला पाहिजे होतास". आत्ता तसा बाद होवू दे बरं मला! आरे तुम्ही टिव्हीसमोर बसून हासडलेल्या शिव्या आणि शाप मला त्या मैदानावर ही ऐकू येतात. "तिच्या आयला, हा सच्या ना काही कामाचा नाही. बिनभरवशाचा बैल आहे साला. काढून टाकायला पाहिजे ... " आणि कायच्या काय . म्हणजे तुम्हाला म्हणायचंय तरी काय ... मी खेळू की नको खेळू? असू देत तुमच उत्तर तुमच्या पाशी. तुम्ही ’नको’ म्हटल्यानं मी काही थोडीच सोडणार आहे. जोवर इथं जिगर मधे आग आहे तोवर हे असंच चालणार ... वेळ आली की उतर मैदानात आणि उतर कसोटीला खरा.

तो कपिल साला ... म्हणे ’सचीन मॅच-विनींग गेम कधी खेळतच नाही’!! अहोsss कपील ... तुम्हाला बोलतोय. मानलं .. हिंदूस्तानचा एक ग्रेट खेळाडू तू. विकेट्सचा विश्वविक्रम, हिदूस्तानचा पहिला वहिला आणि एकुलता एक विश्वकरंडक जिकणारा कप्तान आणि बरेच काही तुझ्या नावावर जमा आहे. आणि मी अगदी लहान असल्यापासनं तुझं खेळणं पहात आलोय. सुनिल, श्रिकांत वगैरेच्या खांद्याला खांदा लावून तुम्ही टक्कर दिली सगळ्यांशी आणि त्याचा नेहमीच हेवायुक्त अभिमान वाटला मला. पण हे मला असं का म्हणून बोलणं. तुझ्या या अशा वागण्यानं मला तर काही फ़रक पडत नाहीच ... पण आपला one of the icons क्रिकेटर असा अद्वातद्वा वागला याचं वाईट वाटतं. वाटत ज्या माणसाकडं पाहून आपण वाढलो तो असा कसा असू शकेल. आणि मला सांग, मी नसेन कदाचीन मॅच संपेपर्यंत पिच वर, पण म्हणून का माझं योगदान कमी होतं. आणि अशा किती मॅचेस आहेत जीथं तू पिचवर आहेस म्हणून आम्ही आशा लावून असतो, आणि तू मात्र आपला टुकू टुकू करत सगळी मॅच घालवतोस. आरे त्या शास्त्री सोबत कितीवेळा अशा मॅचेस हारलो आपण. मग तेंव्हा कुठं होता तुझा हा तोरा. तो शोएब अख्तर म्हणे १०० मैलाची बोलींग करतो ... पण त्यालाही मी चेपलाच की. हा असा सहज six मारून मोकळा झालो. तुझ्या सारखा नाही अर्ध्या पिचपर्यंत जावून "well-left" नाही केला. मग का म्हणून हा दोष माझ्या माथी.

मागे जेंव्हा कादीरला झोडला तेंव्हा म्हण, किंवा त्या वार्नला चेपला तेंव्हा म्हण, हिरॊ कप मधली हिरोगीरी म्हण किंवा वर्ल्ड कप मधला damn good touch म्हण ... तेंव्हा का नाही तोंड उघडलं तुझं? आरे जर हक्कानं शिव्या घालयच्याच असतील तर हक्कानं स्तुतीही करायची ताकदही ठेवावी माणसानं. अशा वेळी उगीच वाटतं, माणसं "मोठी" झाली म्हणजे "मोठेपणा" विसरतात का? पण तसंही काही नाही. आरे ब्रॅडमननं स्वतः तोंडभरून कौतूक केलं तेंव्हा आभाळ ठेंगणं झालं होतं. जावू दे. मी काही इथं माझी बाजू मांडायला नाही आलो. पण म्हटलं एकदा तुझा गैरसमज दूर करायचा प्रयत्न तरी करून पाहू. तिकडं ते बिग-बी आणि शाहरूख असेच वागताहेत तुझ्यासारखे. मला एवढच म्हणायचंय ... तुझा काळ वेगळा होता आजचा काळ वेगळा. खेळाडूकडनं पर्वताएवढ्या अपेक्षा करून लोक इथं मॅच पहायला येतात. तिकीट काढून मॅच पहायला आले किंवा केबलवाल्याचे पैसे दिले म्हणून त्याची भरपाई आमच्याकडनं करू पहातात. आरे, प्रत्येक चेंडू अगदी सिमेबाहेरच गेला पाहिजे असं असेल तर मग तुझ्या सारख्या गोलंदाजाचं काय व्हायचं याचा कधी चुकून तरी विचार केलाय? क्रिकेट हा बॅट आणि बॉल यातलं द्वंद्व आहे. त्याला त्याहून वेगळं समजून, पर्सनल होवून भावनेचा भरात हवं ते बोलू नये. मागे एकदा तो इम्रान खान असाच ओकून गेला. त्याचं तेवढं वाईट नव्हतं वाटलं जेवढं तुझ्या इग्नोरन्सच वाटलं. काही झालं तरी तो पडला प्रतिस्पर्धी. माझ्या मनाचं खच्चीकरण करण हे त्याला क्रमप्राप्त होतं. आणि ते जाणून मी सहजपणे निभावून घेतलं. पण तूच असा जर घरभेदी वागू लागलास तर मग आम्ही बघायचं तरी कुणाकडे?

आणि तुला काय वाटतं. मला काही उलट उत्तरं देता येत नाहीत. पण शब्दाने शब्द वाढवणे आपल्या खाक्यात नाही. आपलं बोलणच थोडकं. "Let the work speak for you". त्या पाकिस्तानला जोर चढला होता २००३ वर्ल्ड कप मधे. म्हणे पाकिस्तानची टीम हिदुस्तानपेक्षा सरस आहे ... ए चिरकूट ... आरे जा. आजवर एकदा तरी वर्ल्डकप मधे जिंकलाय का आमच्या विरूद्ध? मग कशाचा एवढा नशा. सेहवाग आणि माझ्या जोरावर आम्ही मॅच जिंकली आणि बसले का शेपूट गां$#त घालून. मी म्हणतो आरे करून दाखवा ना दम असेल तर ... उगीच फ़ुशारकी कशाला मिरवायची? एक एक करत जवळपास ३० वेळा शतकं हुकली म्हणून रडत नाही बसलॊ. आज चुकलं, उद्या नाही चुकणार याच आशेवर खेळतोय.

जावू दे. "रोज मरे त्याला कोण रडे" अशातली गत होवून बसलीय. आणि तू जर असाच ओरडत रहाशील तर तुझं बोलणंही मी ’रोज मरे" category मधे टाकून मोकळा होईन ... मग एवरेस्टच्या शिखरावर उभा राहून, बेंबीच्या देठापासून, घसा फ़ाटेस्तोवर जरी ओरडलास तरी ते माझ्या कानाच्या पडद्यामागे पोचणार नाही.

आता शहाण्यासारखा वाग नाही तर वेड्यासारखा. निवड तुझी. पण तू जर तुझं iconic status टिकवून ठेवू शकलास तर मला मात्र अभिमान वाटेल.


**** सप्टेंबर ६, २००७ *******************************
हे पोस्ट लिहील्या पासनं सचीनची ४ शतकं हुकली. आता काय कपाळ फ़ोडायचं त्यानं.

Tuesday, July 24, 2007

उगीच आपलं लिहावसं वाटलं म्हणून

२४ जुन ते २४ जुलै. एक महिना ... बापरे! महिनाभर लिहायसारखं काही सुचलच नाही का मला .. am i so unproductive!

काय चाललय काही समजत नाहीये. ऑफ़ीसच्या उचापत्या (म्हणजे नियमीत काम ... बाकी उपद्व्यापात आणि उचापत्यात मला तसा इंटरेस्ट नसतोच मुळी ... "आपण भले आपले काम भले") सांभाळता सांभाळता दिवस संपून जातो आणि रात्री झोपताना जाणवतं आज लिहायचं राहून गेलं. मनाला हुरहुर लागून रहाते. मग "उद्या लिहायच" असं ठरवून झोपी जायचं .. आणि उगवत्या सुर्यासोबत परत त्याच उचापत्या ताटात घेवून दिवसभर या डबड्यासमोर खटखट करत बसायचं ... परत रात्री पाठ टेकेपर्यंत.... छ्या ... जाम वैतागलोय. आणि म्हणून आज म्हटलं ... आज ऑफ़ीसमधे बसूनच लिहायचं. (ठावूक आहे की हे काही लगेच लिहून संपणार नाहीये म्हणून ... पण साला सुरूवात तर करू).



देवाशपथ सांगतो ... इतकं लिहावसं वाटतं की कधी कधी तर स्वप्नात ब्लॉग लिहून होतो ... आणि सकाळी उठलं की पाटी पुसून ठेवल्यासारखी दिसते .. आणि असा तो दिवस एकदम बेकार जातो. दिवसभर मनाला बोचत रहातं abortion करून आल्या सारखं. एक ब्लॉग जन्मण्याआधीच संपल्याचं दुःख्ख बोचत रहातं. आजचा दिवस असाच. पण म्हटलं आजची बोच जरा वेगळ्या पद्धतीने हाताळावी. नेहमी दिवसभर कुजत बसतो. पण आज म्हटलं जरा वेगळं ... का म्हणाल तर त्याचं inspiration Deb कढणं घेतलंय. Deb म्हणजे Everybody Loves Raymond मधली Debra. परवाचा भाग Ray च्या mid-life-crisis वर होता. आता हा coincidence महत्वाचा कारण आजकाल आम्हीही त्याच गल्लीत फ़िरतोय. असो, तो विषय वेगळा. इथं संदर्भ एकढ्यापुरताच की, त्या भागात Ray ला mid-life-crisis चा बोध होतो आणि तो असा काही वागतो, जसा काही आता संपणारच आहे आणि आयुष्याला काही अर्थच शिल्लक नाहिये. त्या वेळी Deb त्याला सांगते, मिड लाईफ़ क्रिसीस सर्वांनाच असतो ... पण महत्वाचं असतं ते म्हणजे आपण तो हाताळतो कसा. असो.

मागल्या दोन वर्षापासनं मी ऑफीसच तोंड नाही पाहिलय. घरनंच काम करतो. त्यामुळे तिथं काय चालतं हे ठावूक नव्हतं. पण आता भन्नाट बोअर व्हायला लागल होतं घरी म्हणून म्हटलं चला जरा तिथं जावूनही पाहू. म्हणून सुरुवात केलीय. आता आवडेल की नाही ठावूक नाही .. पण ट्राय मारायला काय हरकत आहे. खरं सांगू, असं काही ट्राय मारायचं म्हटलं की डोक्यात झिणझीण्या येतात. असंच ट्राय मारायचं म्हणून लग्नाच्या फ़ेऱ्या मारल्या .. आज पर्यंत अडकलोय. असो. (लग्न आणि बायको या बद्दल इथं काही लिहीत नाही. परवा आमच्या सौ नी माझं लिखाण वाचलं आणि बाकी सगळ्या कमेंट एकीकडं करून कमेंट दिली, ती ही इन पर्सन ... "असं प्रत्येक ब्लॉगमधे का माझ्याबद्दल ओरडतोस. मी काय तुला इतकी ....." ... असो. विषय बंद ...)

हं. तर मला काय म्हणायचंकी मला लिहायचंय. आणि कशाबद्दल लिहायचं त्याचे ही जवळपास ३-४ ड्राफ्ट तयार पडलेत. पण कसं हजामच्या दुकानात हजाम कसा प्रत्येकाची अर्धी दाढी करून सगळ्यांना अर्धवट ठेवतो. तसे सारे ब्लॉगचे तुकडे पडलेत. एकदा बसून निट लावायला पहिजेत.

अभिजीत बाथेनं मागे एकदा लिहीलं होतं ... "रिदम पाहिजे..." काय भन्नाट लिहिलंय माहिती .. .अगदी तसं काहीतरी होतंय. सुचतंय बरंच, पण साला शव्दात उतरतच नाहिये. पण यू नो, सुरूवात केली की गाडी घरंगळत रहाते .. म्हणून हा असा विखुरलेला ब्लॉग.

आता इथं संपवतो आणि लवकरच एखादया ड्राफ़्टचा पक्का ब्लॉग तयार करून तुमच्या माथी मारतो. मग वाचा नाहितर न वाचा. तुमचा प्रश्न.

Sunday, June 24, 2007

भकास रात्र

"संगीत" हा शब्दच मुळी संगीतमय आहे. ऐकता क्षणी मनात विचारांची गर्दी व्हायला लागते. आणि "नेमके कोणते विचार" हे ठरतं ते या क्षणी मन कोणत्या संगीताचं भुकेलं आहे त्या वरून (आता तुमची कॉलेजातली एखादी संगीता असेल तर मग तुमची महफ़ील चुकलीय. आमचं बापडं वाजणाऱ्या संगीताबद्दल चाललंय, तेंव्हा पुढलं दार बघा). आणि त्यात जर ती गझल असेल तर मग काय सांगायचंय. मन मोहरून जातं एखाद्या गझलेवर, त्यातल्या कडव्यावर .. आणि अख्खी गझल किंवा कडवं सोडाच ... अगदी एखाद्या ओळीवर देखील मन घुटमळतं ... घुटमळतं ... आणि घुटमळंत रहातं. बर्याचदा तर भन्नाट प्रयत्नांनीही ते बिचारं पुढ सरकायला तयारच होत नाही, स्वतःचं शेपुट पकडू पहाणार्या कुत्र्यासारखी अवस्था होते अक्षरशः, शेवटी शेपूट गळून पडतं, कुत्र्याचे सात जन्म पुर्ण होतात, गतजन्मात भटकत असल्यागत पण मन मात्र पुढ सरकायला तयार होत नाही. आणि मग असा तो दिवस कधी प्रसन्न तर कधी अगदी सुन्न जातो.

आजचीच गोष्ट घ्या. अथर्वचा ४था वाढदिवस साजरा केला, दिवसभर थकून आडवा झालोच होतो आणि दारावर बेल वाजली. म्हटलं कोण असेल या वेळी. नाही म्हटलं तरी रात्रीचे २ वाजलेत. अशावेळी दार तर सोडाच, पण फोनची घंटा जरी वाजली तरी दचकायला होतं. मन कावरं बावरं झालं. पण जावून दार पहाणं आवश्यक होतं. म्हणून गेलो आणि दाराची कडी किलकिली करून पाहिली ... तर खूद्द जगजीत होता. म्हटलं, बाबा रे तुला काय चित्रा न हाकललं का गालीब नकोसा झालाय म्हणून तू अशा अवेळी ईकडं तडफ़डलास. तर म्हणे, मला ऊचकी लागली, मला वाटलं तुला आठवण झाली, म्हणून आलो. आणि वेड लागल्यागत गायला लागला ... "वो कौन हैं, दुनियामे जिसे ग़म नही होता ... किस घर मे खुशी..." झालं बोंबललं ... अख्ख्या रात्रीचं खोबरं करून टाकलं. त्याचा जड आवाज ऐकतच होतो तेवढ्यात आतनं आमची लता मंगेशकर म्हणाली, "कोण आहे आता ... झोप ना प्लीज". म्हटलं "बाईगं, तू होवून जावू देत तुझी झोप, माझी उडालीय." आणि मग परत जगजीतच्या सुराशी सुर जुळवला.

"वो कौन हैं, दुनियामे जिसे ग़म नही होता, किस घर मे खुशी होती हैं मातम नहीं होता"
खल्लास. आयुष्याकडच्या सुखाच्या सगळ्या अपेक्षा गळून पडल्या. मी जगत असलेल्या या क्षणाचा अर्थच बदलून गेला. आणि मन कुठ तरी खोल रुतून बसलं. आयुष्यात नाही म्हटलं तरी सुखच सर्व काही नाहिये असं सांगणारा जगजीत माझ्या डोक्यात घुमत राहीला बराच वेळ. गौतम बुद्धांनंतर असं काही सांगणारा हाच.

"ऐसेभी हैं दुनियामे जिन्हे ग़म नही होता, इक ग़म हैं हमारा जो कभी कम नहीं होता"
ना! दुःख्ख कुणाला नसतं. अगदी सर्वांनाच असतं. पण प्रत्येकाला आपलं दुःख्ख मोठं वाटतं. "माझीच लाल" म्हणणारी मंडळी आपण, इथंही मागं हटायला तयार नसतो. तुला एक तर मला दोन, तुला दोन तर मला दहा त्रास. आरे कुणाला सांगतो तुला काय होतंय ते. इथं माझंच आणखी सरलं नाही .. चल हो बाजुला, मला जरा माझ्या दुःख्खाला वाट करू देत.

"क्या सुरमा भरी आखॊंसे आसूं नही गिरते, क्या मेहंदी लगे हाथोंसे मातम नहीं होता"


अगदी व्याकुळ झालं डोळ्यातनं अश्रु गाळायला. चटकन डोळ्यासमोर ती नवविवाहीत विधवाच आली. तीचं ते सगळं उद्वस्थ आयुष्य दिसायला लागलं आणि मन ऊद्विग्न झाल. मेहंदीने रंगलेले हात आणि रक्तानं रंगलेले डोळे ... नकोसं झालं ते चित्र ... सगळच कसं भकास दिसायला लागलं ... मनातली विलक्षण पोकळी भरायची कशानं तेच सुचेनास झालं.

"कुछ और ही होती हैं बिगडनेकी अदायें, बनने ही संवरने ही मे आलम नहीं होता"
छ्या ....! मन कुठं तयार होतं हे ऐकायला. ते मागल्याच ओळीवर अडकलं होतं. आणि माझा कुत्रा झाला होता. रात्रीच्या ३.०० ला देखील त्या विधवेच्या आयुष्याची राखण करायची जबाबदारी असल्यागत तीच्या भोवतीच फ़िरत होतं. "क्या सुरमा भरी आखॊंसे आसूं नही गिरते" ... क्यों नही गिरते, जरूर गिरते हैं. लग्नानंतर बापाचं घर सोडून जाणारी ती बाला कोण रडते. आजपर्यंतची सारी खरी खोटी नाती मागे सोडून नवीन आयुष्यात पाय ठेवायचं दिव्य करायचं म्हणजे काय सोपं नाय. अगदी अनोळखी माणसावर विश्वास ठेवून पुढल्या आयुष्याची स्वप्नं रंगवताना येणारे नको ते विचार तीच्या मनाला कोण पीळ पाडत असतील. आणि असं सुरूवातीलाच सरणाला आग द्यायची म्हणजे त्याचा दाह अंतःकरणापर्यंत पोचणारच. आयुष्याएवढं मोठ दुःख्ख ते ("आभाळा"एवढं म्हणून ते दुःख्ख लहान करण्याची हिम्मत नाहीये आपली), ते पचवायचं म्हणजे बाईचं ह्र्द़य असायला पाहीजे. आणि अशावेळी मी स्वतःला नशीबवान समजतो की पुरूषाच्या जन्माला आलो. देवाशपथ, आपल्यात ताकद नाहीये हे असं काहीतरी सहन करायची. किंवा मग कदाचित देव स्त्रीजन्म देताना ते हवं असलेलं (की नको असलेलं म्हणू) धैर्यही देत असेल.

Anyway, देव करो आणि असा ग़म दुनियात कुणालाच न देवो.

पण एक न ऊलगडलेलं कोडं म्हणजे अशा शुभ दिनी मला हे असं जगजीतने का पछाडावं. आरे मेलं तरी पुरतील इतक्या सुंदर रोमटीक गझ़ल्स आहेत, मग हेच का भोसडायचं होतं तुला ... आणि तेही इतक्या रात्री. जा ना बाबा ... चित्राकडं जा आणि तीला म्हण, "ये करे और वो करे, ऐसा करे, वैसा करे ... " .. जैसा करायचंय वैसा कर .. पण इथनं निघ... हं, निघाला बिचारा शेवटी ३.४५ ला. .... डोळे जड झालेत माझे ... कदाचीत न झोपल्यानं असतील किंवा त्या विधवेचे डोळे उतरले असतील माझ्या डोळ्यात ... थकायला झालंय. "बाय". ये परत कधीतरी. टेकतो आता.

[नोट: कुणीतरी मला "बर्याचदा" किंवा "करणार्या" हे शब्द मराठी फ़ॉन्ट मधे कसे लिहायचे त्याच key sequence सांगा रे प्लीज. या "र" आणि "य" च लग्न मला लावताच येईना झालंय]

Friday, June 1, 2007

४ वर्षाचा सवाल!

अथर्वसोबत आजकाल काही बोलायचं म्हणजे मला भ्यायला होतं. बोलणं कमी आणि ऐकणं जास्ती आणि त्याहीपेक्षा जास्त विचार करायला लागणं. आमचा हा पहिलाच पराक्रम असल्यानं आणखी सवय झाली नाही. हो, ४ वर्ष झाली पण आत्तादेखील असं वाटतं हे कार्टं अजून नविनंच आहे. चेहरा आणि आवाज सोडला तर बाकी काही ओळखीचं नाही असं वाटतं. रोज काहीतरी नवंच रूप, नवा विषय, नवा प्रश्न.

अगदी परवाचीच गोष्ट. डिनर टेबलवर आमची हॅप्पी फ़ॅमीली (म्हणजे चिरंजीव, विजू आणि मी) "गिळायला" बसली होती. "गिळायला" हा शब्द महत्वाचा कारण जेवणाकडं कमी आणि गिळण्याकडंच जास्ती लक्ष होतं. बायकोनं परत आम्हाला गिनिपीग बनवायच्या ऊद्देशानं काहीतरी नविन पदार्थ ताटात टाकला होता. (खरंतर "विक्षीप्त" किंवा "विचीत्र" म्हणावसं वाटतंय, पण लहाणपनापासनं मातोश्रींनी शिकवलंय "जेवणाला नावं ठेवू नयेत" .. म्हणून संयम ठेवून "नविन" म्हणंण आलं) तेंव्हा "कसं झालंय" हा अतिशय प्रिय (यातला "तिशय" silent) प्रश्न कानावर पडण्याआधी ताटातलं पोटात टाकून आपला computer घेवून बसावा हा ऊद्देश. पण जे नशिबात लिहून आलंय ते टाळंणं का माणसाच्या हातात आहे (बायकांच्या असेल कदाचित). पोटातला अग्नी जरासा थंड पडला होता तेवढ्यात खडा सवाल, अगदी प्रेमळ आवाजात कानावर धाडकन येवून आदळला - "आवडलं?". (नेमक्या अशाच वेळी कसा तीला आवाज प्रेमळ काढता येतो हेच मला कळंत नाही. बाकीवेळा कानाची ओंजळ करून जरी वाट पाहिली तरी आवाज थोडादेखील प्रेमळ निघत नाही. anyway, तो एकूण वेगळाच विषय आहे). हं, तर प्रश्न येवून आदळला ... आणि घशातला घास घशात, हातातला हातात आणि ताटातलं सगळं घशात घुसल्यासारखं वाटलं. पण हे expected आणि सवयीचं असल्यानं पटकन "हं हं" असं तोंडातून निघून गेलं. पण जसा मला प्रश्न सवयीचा, तसंच तीला ऊत्तर आणि त्यात ती हुशार, समजून गेली आणि पुढलं जेवण काय hot होतं म्हणून सांगू. जावू देत, माझ्या सार्या उपवर मित्रांना हे माहितीच असेल. असा विषय सोडून जायची माझी किंचीतही इच्छा नव्हती, पण "बायको" म्हटलं की नेहमीच विषयाला सोडून असतं ... असो ...

हं तर डिनर टेबलवर हे महाभारत चालू होतं आणि बाळराजे "मात्रुभाषे"त वदले ... "daddu, where did I come from". (आमचे सुपूत्र आम्हाला "daddu" म्हणून संबोधतात .. daddy नाही की dad नाही ... कुठून शिकले माहिती नाही ... पण daddu. anyway स्वतःच्या पोरान काही म्हटलं तरी छानच वाटतं. तरी ऊगीच नाही म्हणाले थोर - आपला तो बाबल्या आणि दुसर्याचं ते कार्ट). मग आम्हाला ते विचार करण आलं. घास चावता चावता डोकं खाजवणं चालू होतं ... पण अशा प्रश्नांची सरळ ऊत्तरं देणं आवश्यक आहे नाहीतर पुढे चालून महागात पडतं म्हणे. आणि मी म्हटलं "मम्माच्या पोटातून". वाटलं नेहमीप्रमाणे "ओह!" असा उद्गार बाहेत पडेल आणि थंड पडतील .. कसलं आलंय ... लगेच एक सवाल ... "i am so big,
mumma's tummy is so small ... how did I fit in there". आणि मग दुसरं सत्र डोकं खाजवायचं आणि उत्तराचं. मग बरेचसे "why / how / when" झाले ... माय आणि बाप कुतुहलानं पोराच्या प्रश्नाची ऊत्तरं देत राहीले ... आणि या सगळ्यात एक फ़ावलं ... बायकोच "आवडलं का?" विरघळून गेलं.

बरं आमचेच साहेब हुशार आहेत असंही नाही. बहूतेक वर्षे ३-५ हा वयोगटच मुळात जिद्न्यासू असतो. माझ्या एका मैत्रीणीच्या घरी तीच्या बहिणीसाठी स्थळ पहाण्याचा विषय चर्चेत होता. तीचा ४ वर्षाचा पोरटा सगळं कसं मन लावून ऐकत होता आणि मधेच मुंगी चावल्यागत ओरडला ... "आई, बाबानी कुणाशी लग्न केलं गं". तीनं अगदी गालावर पापा देवून, हसून ऊत्तर दिलं "माझ्याशी". पण पुढं जे ऐकायला मिळालं ते कदाचीन कुणाही प्रौढ व्यक्तीच्या विचारशक्तीच्या बाहेरचं होतं .... "वेडेच आहेत बाबा ... घरातच लग्न केलं. नाहितर मावशी बघ कशी बाहेत करतेय." झालं. अख्ख्या घरात हशा.
हेच नग एके दिवशी आईला, "आई याला काय म्हणतात गं?" आईनं तत्परतेनं सांगीतलं, "पापण्या". "कशाला असतात त्या?" लगेच दुसरा प्रश्न." आईनं त्याच तत्परतेनं सांगीतलं, "डोळ्यात काही जावू नये म्हणून". या ऊपर काय म्हणाले असतील महाशय? "काही उपयोग नाहीये त्यांचा. डोळ्यात काही जावू नये म्हणून असतील तर मग अशा बाहेर कशाला आहेत ... खाली पाहीजेत ना ...". झालं. बिचारी आई खर्या अर्थानं अबला होवून निरूत्तर. पण त्या दिवसाआधी त्या आईला पापण्यांचा आकार कधीही जाणवला देखील नसेल.

असंच एका शुक्रवारच्या रात्री मी आणि विजू बोलत बसलो होतो. विषय होता "विकेंडला काय करायचं". इथं अमेरीकेत हा एक सर्वात मोठा प्रश्न. आरे २ दिवसांचा विकेंड तो. पण माणसं सोमवारपासनं शुक्रवार पर्यंत तेच ठरवतात ... "विकेंडला काय करायचं". तसं म्हटलं तर नुसतं झोपून राहीलं तरी २४ तास असेच कटतील. पण बायको म्हटलं की एक तर झोपू देणार नाही, जागेपणी आपल्याला जे करायचंय ते करू देणार नाही आणि तर अर्ध्या तासाला खेटेल "सांग ना काय करायचं ऊद्या?" तर अशा या महाबिकट विषयावर आमचं debate चाललेलं. मी विचारा आठवडाभर काम करून ("काम करून" बायकोसाठी, खरंतर स्वतःला बिझी ठेवून जास्ती) थकलेला, म्हटलं "आराम करू. बरेच दिवस झाले चांगली झोप नाही झाली". झालं भडकली. "तुला तर आराम करण्याशिवाय काही सुचतंच नाही. काढ नुसत्या झोपा. त्याच्यासाठीच लग्न केलंस. आठवडाभर ही घरी आणि विकेंडला ही घरीच ठेव". मला माझी चूक कळली (किंवा कळविण्यात आली) .. आणि मी काही बोलायच्या आधीच आमजे हिरो बोलले, "mumma, you dont like daddu, then why did you marry him. Why don't you marry me". बरं झालं बोलले ... पुढलं महायुद्ध टळलं आणि विषय हलका झाला. "करते रे बाळा तुझ्याशीच करते पुढल्यावेळी" असं काहीतरी गोजिरवाणं बोलून जवळ घेतलं त्याला. मी म्हटलं, "बाईगं, त्याला जीतका जवळ घेतेस तीतका मला ही घे. विकेंड काय रोज फ़िरवीन" आणि हसण्यात वेळ मारून नेली.

तर असे एक आणि कितीतरी प्रश्न रोज माय-बापांना भंडावून सोडतात. पण एक मात्र खरं. असले ४ वर्षाचे सवाल माझ्यासाठी मात्र वरदान असल्यासारखेच असतात. प्रत्येक वेळा माझी सुटका करतात. म्हणून हिला बोलायचं झालं की मी त्याला जवळ घेवून बसतो. आपलं शस्त्र तयार असलेलं बरं, नाहितर गळा कापला जायचा एखादेवेळी गाफिलपणे.

म्हणून अथर्वला म्हणाव वाटतं ... बोल रे माझ्या राजा.... तू असाच बोलंत रहा.

Wednesday, May 30, 2007

B.D.L.C. : Blogger Development Life Cycle

"अक्षरश: पीक आलंय ब्लॉगर्सच. हेssssss इतके ब्लॉगर्स. इकडं ब्लॉगर्स तर तिकडंही तेच. हा ब्लॉगर तर तोही त्याचा भाचा नाहीतर कोणीतरी. आरे मानलं बाबा फ़्री आहे. म्हणून काय वाटेल तसं पेरंत सुटायचं.... " वगैरे वगैरे आणि असे बरेच काही विचार मनातून गेले. पण ज्या क्षणी मॅडम भुस्कूटेंचा ब्लॉग वाचला वाटलं चला आपण पण उडी मारून पहावी ... देवाशपथ .. फ़ाटली ... टर्रर्र (अगदी आवाजासहीत).

"टर्रर्र" शब्दावरून लहाणपणीचा एक प्रसंग आठवतो. पाचवी सहावीला असेन तेंव्हाचा. आमचे मोठे बंधू दोन वर्षानी मोठे. आणि मोठे म्हणजे सगळ्याच क्षेत्रात "मोठे". बंधुराजांनी शाळेतल्या कोणत्याही स्पर्धेत भाग घेतला - मग वक्त्रुत असो की वादविवाद, कथाकथन असो की कविता लेखन, आणि बरंच काही - पहीले (आणि क्वचितं दुसरे) आलेच म्हणून समजा. बरं साहेबांचा मान असा की बक्षीस वितरणामधे सर्वात शेवटी यांना निमंत्रण स्टेजवर. का तर सगळ्या स्पर्धेचं एकच मोठं बक्षीस मिळायचं. तर अशा या "पराक्रमी" (पराक्रमी नाहीतर काय ... ज्या रस्त्याला आमची पायधूळ लागणं वर्ज्य तीथं साहेब घोडे चौखूर दौडवायचे म्हणजे पराक्रमंच म्हणावा) भावाकडं बघून वाटलं आपण ही कथाकथानामधे भाग घ्यावा. कथा निवडली "ही मोठी माणसं अशीच" (त्याला ही कारण म्हणजे बडे बंधू या कथेमधे पहीले होते म्हणून ... नाहीतर आम्हाला चॉईस हा प्रकार कधी जमतंच नाही). स्पर्धा सुरू झाली .. एक दोन तीन .. "n" स्पर्धक आले गेले ... आणि हुश्शं .. आमचं नाव आलं. कसलं आलंय. पावलांना कसतरी फ़रफ़टत स्टेज पर्यंत पोचवलं (तिथपर्यंत पोचवायला देखील मध्ये आई बाबा होतेच .. जा बेटा (आणि वाट लावून ये) असा "धीर" द्यायला). पण म्हणतात ना, रक्तात पाहीजे ... माईक समोर ऊभा राहीलो आणि सुरू झालं ... "तुला गं (शांतता) तुला गं ( थोडी जास्ती शांतता) mmmmm .... तुला गं (आणि more शांतता) " आणि असे बरेचसे "तुला गं .. शांतता... तुला गं .. शांतता". गाडी पुढे सरकेचना. संपली कथा. लोकांनी टाळ्या वाजवल्या (त्या टाळ्यांचा अर्थ पुढे कळाला. त्या बालवयात sarcastic हा शब्द ठावूकंच नव्हता ना). तीथून जो काढता पाय घेतला तो सरळ ईंजिनीअरींगच्या send off पर्यन्त माईक समोर गेलोच नाही. तर संदर्भ असा की तेंव्हा जी फाटली होती तीच आत्ता परत एकदा. (म्हणजे ... तशी कळ सवयीची आहे,पण वेळ नाहीये. बराच काळ ऊलटलाय).

महिना झाला (किंबहूना जास्ती) ... डोक्याचा तंबोरा वाजून वाजून अगदी वाट लागलीय. कोण डोकं दुखतंय म्हणून सांगू. पण आज "एकांतात" विचार करत बसलॊ होतो म्हटलं काही झालं तरी आपलं इंटरनेट वरचं अस्तित्व सिद्ध करायचंच. बराच "जोर" लावून विषय सापडला (विचारवंतांना मी जो "एकांत" आणि "जोर" म्हणतोय त्याची सवय असेलच. बाकी मायबाप जनतेनं माफ करा, पण असं पब्लीक डोमेन वर ऊघड ऊघड बोलता येत नाही) - "ब्लॉगर डेवलेपमेंट लाईफ़ साईकल". म्हणजे काय तर विषय शेवटी मीच अणि माझ्यासारखे बरेच.

विषयाचा सार असा की .. एखादा ब्लॉगर निपजतो कसा? बुजतो, रुजतो आणि पुढे कुजतो कसा? (माझ्या कंप्युटरच्या जातबांधवानी आत्तापर्यंत SDLC, PDLC, PMLC आणि बर्याच LCs पडताळून पाहील्या असतील. पण हे प्रकरंण जरा नवं आहे. म्हणजे आणखी कुणी हात नाही घातला एवढंच. बाकी शेकड्यानी अनुभवी सापडतील या क्षेत्रात). तर एका ब्लॉगरच्या जन्मापासनं त्याच्या पिकण्यापर्यंतचा काळ खंगाळून काढण्याचा यत्न.

बालवाडी - "रडा पडा धडपडा": बालवाडी म्हणजे सगळं कसं नवं नवं. प्रत्येक गोष्टीत कुतुहल. तसंच ब्लॉगरचं असतं. हे वाच ते वाच, इकडं नजर टाक, याला कमेंट टाक, त्याल रिमार्क दे, स्वत:च्या ब्लॉग साठी काहीतरी खरडून काढ, विसरून जा, .. परत बे एकं बे. असं बरेच दिवस चालतं. नाहीतरी वाचंन असेल तरच चांगलं लिखाण येतं. नाहीतर सगळं लक्ष्मीबाई टिळकांच्या "कांदबरि" सारखं. असेच दिवस पुढे जातात. बरंच वाचन झालं की मग मनाचे पोरखेळ सुरू होतात ... मॅडम भुस्कुटेंच्याच भाषेत सांगायचं झालं तर "आपण का नाही लिहीत काहितरी?" असा एक चोरटा विचार मनात घर करायला लागतो. झालं. एकदा का मन या जगात उतरलं की बाहेर काढणं अवघड आणि याच अवस्थेत बिचारा व्लॉगर बालवाडी उत्तीर्ण. काढा पेढे. (च्यायला, बालवाडीचे पण पेढे का ... आम्हाला वाटलं पेढ्याचा हक्कं फ़क्त दोनदाच .. दहावी बोर्डात आल्या वर आणि पोरगा काढल्यावर. बरं आहे .. चालू देत. आपल्या बापाचं काय जातंय .. फ़ुकट भेटतंय तर खा ना गुपचूप)

इयत्ता पहिली - "अ आईचा, ब बाबाचा": एकदा पहिलीत आलं की सर्वात आधी ब्लॉगची अक्षरओळख व्हायला लागते. रोज काहीतरी नवीन शिकायला मिळतं. इंटरनेटच्या शाळेत नवनवीन मित्र / मैत्रीणी मिळतात आणि बोबडे बोल बोलायला शिकतो. आपलं आपल्यालाच कौतुक वाटावं असं काहीतरी बोलत रहातो. बालवाडीतून पुढं सरकलं की नव्या जगात ब्लॉग या शब्दाची अक्षर ओळख पटते. भिंतीवर टांगलेल्या अक्षरांच्या calendar वरनं शिकलेली बाराखडीसारंखं काहीतरी नविन शिकल्यागत मन ब्लॉग बद्दल रोज शिकत जातं. अक्षरापासनं मग छोटी वाक्यं तयार करून "आई घर बघ, बाबा घर बघ ..." आणि असंच काही फ़रफ़टल्यागत सुचंत जातं. आणि एक दिवस बिचारा ब्लॉगर लिहायला बसतो. म्हणजे एकूण काय तर पहीलीची परीक्षा काही अभ्यास न करता उत्तीर्ण. इथं पेढे बिढे काही नाही. बालवाडीत कळालं की पेढे असे केंव्हाही नसतात तेंव्हापासनं आम्ही ठरवून टाकलंय .. आता पेढे सरळ दहावीलाच किंवा नंतरच्या पराक्रमालाच.

इयत्ता दूसरी - "ब्लॉग पहाव लिहून": ऊन्हाळ्याची सुटी संपवून शाळेत आलंकी कसं या विषयावर बोलू की त्या .. या बद्दल बोलू की त्या बद्दल .. अशी त्रेधातिरपीट ऊडते अगदी तसंच या दुसरीच्या ब्लॉगबहाद्दराचं होतं. डोक्यात हजार विषय घेवून तो लिहायला बसतो आणि घटकेत हा तर घटकेत तो विषय त्याला खाजवायला लागतो. आणि मग हे लिही draft save कर, ते खरड draft save कर .. असं होतं आणि हेsssss इतके मोठे drafts पडून रहातात .. पब्लीश किती तर शून्यं. मग एकेदिवशी सगळ्या ड्राफ्ट्सची होळी. निवडक ब्लॉग्स बाजूला काढून बाकी सगळे कचरापेटीत टाकून मोकळे. असेच मग काही दिवस हे वाच - ते वाच करत गेले की मग अचानक कळ ऊठते आणि एक ब्लॉग पूर्ण होतो ... भीत भीत तो पब्लीशही होतो ... या भीती पोटीच तर म्हटलंय ... "घर पहावे बांधून .. लग्न पहावे करून ... आणि ब्लॉग पहावा लिहून (जमल्यास पब्लीश करून)". तर अशा महत्त्प्रयत्ने जन्मा घातलेला ब्लॉग इंटरनेट वर झळकू लागतो. आणि मग आपलं दुसरीचं प्रगती पुस्तक हातात घेवून बालराजे माय, बाप, मित्र, मैत्रीणीना दाखवंत सुटतात.

इयत्ता तिसरी - "आधी लग्नं कोंढाण्याचं": दुसरीच्या निकालानंतर सगळ्यांकडनं जे cheering मिळतं, त्या जोरावर मग हा आपला तानाजी बिचारा गड शीर करायला निघतो. पण त्याला कुठं ठावुक असतं की रस्त्यात खड्डे, टेकाडं आणि बरंच काही आहे. बाळबोध बळावर निघालेले आमचे तानाजी शेवटी समजून चुकतात इथं आपल्यासारखे शेकडयानी आहेत. पण शेवटी ऊगाच काय तो तानाजीच नाय .. असा धीर सोडून थोडीच परतेल. साला घोरपडीला लटकेल नाही तर शेल्याची ढाल करेल, पण गड सोडणार नाही. मग selected विषयाला हात घालून लिहीणं चालू होतं. हळू हळू ब्लॉगींग सवयीचं होतं .. पण लिमिटेड सवयीचं.

इयत्ता चौथी - "लगे रहो मुन्नाभाई": ४ वर्षाचा पोरगा पाहिलाय का ... कसा नॉनस्टॉप बोलत रहातो ... तसे आमचे kiddo लिहायला शिकतात. मुन्नाभाई सारखं कोणत्याही विषयावर expert व्हायला शिकतात. प्रसंगी रात्र रात्र बापूवर वाचून जगायला शिकतात. आणि मिळेल त्या विषयाला आडवं करायची ताकद जमवायला शिकतात. नाहीतरी पुढल्या वर्षी पाचवी म्हणजे थोडं दांडगट व्हायलाच हंवं. बारा घरची बारा पोरं भेटणार आपल्याला वर्गात म्हणजे आपण पण पक्के असायलाच पायजे ना. म्हणून एखादा "सर्कीट" सोबत ठेवतात .. .अहॊ सह-ब्लॉगर हो. आणि विषयांची / विचारांची देवाण-घेवाण चालू रहाते. आणि हळू हळू मुन्नाभाई MBBS ची चौथी पूर्ण करतात. म्हणजे काय तर अस्खलीत बोलता वाचता येतं म्हणा की.

आणि मग पाचवी .. सहावी .. दहावी .. पेढे ... इत्यादी करत करत पोचतं ग्रॅजूएशन.
ग्रॅजुएशन / PhD / आणि बरंच काही - हे भले ग्रेट! धीरे धीरे मुन्नाभाई, तानाजी आणि बाळराजे ग्रजुएशन पर्यंत येवून पोचतात. या काळात विषय काय आहे याची काळजीच रहात नाही. द्या विषय आणि घ्या ब्लॉग ... काम कसं एकदम फ़टाफ़ट, म्हणजे Fedex च्या overnight deliveryला लाजवेल असं... ब्लॉग कसला अख्खं thesis पूर्ण होतं बघता बघता. आणि विद्यापिठात प्रथम क्रमांक यावा तसे ब्लॉग सर्च मधे वरल्या क्रमांकावर सापडू लागतात. आपलं नाव इंटरनेटवर असं वरच्या क्रमांकावर यावं म्हणून लोकांचे काय प्रयत्न चालू असतात ... त्यात आपला नंबर लागावा म्हणजे गगनातला आनंद तो. आपण एक "successful" ब्लॉगर ही कल्पनाच मनाल हिंदोळे देते ... आणि महाशय इंटरनेटवरच्या सागरात मस्त पोहू लागतात.

झालं. संपलं. वाजलं एकदाचं.

ऒSSSS .. कुणीतरी आवाज दिला बहुधा. काय म्हणालात? पुढे काय? काय पुढे!!! आरे हो ... आम्ही "लाईफ़ साईकल" म्हटलं नाही का... म्हणजे circle पूर्ण व्हायला हवं नाही? शुक्रिया remind केल्याबद्दल. नाहीतर आम्ही निघालॊ होतो हात झटकून आपले.. हं, तर होतं काय ... की एकदा ग्रॅजूएशन (आणि पोस्ट ग्रॅजूएशन) झालं की माणसाला वाचनाचं वेड लागतं म्हणतात (नाहीतरी वाचनाच्या वेडापाईच माणसं PhD बगैरे करतात). तर असा वेडा माणूस आणखी करेल काय? किती म्हणून स्वत:च लिहील आणि स्वत:च वाचेल ... म्हणून तो भरकटंत रहातो इंटरनेटवर ... हा ब्लॉग वाच ... तो ब्लॉग वाच .. याल कमेंट टाक .. त्याला रिप्लाय कर .. म्हणजे एकूण काय तर तीच भटकंती .... परत बालवाडी आणि पहीली सारखीच.

ईती BDLC!

हूश्शsssssssssssश्श!!!! शेवटी आमची "तुला गं" ची कथा ख"टर्रर्र" ख"टर्रर्र" करंत शेवटाला पोचली ... ... २५ वर्षानंतरच सही.