Sunday, June 24, 2007

भकास रात्र

"संगीत" हा शब्दच मुळी संगीतमय आहे. ऐकता क्षणी मनात विचारांची गर्दी व्हायला लागते. आणि "नेमके कोणते विचार" हे ठरतं ते या क्षणी मन कोणत्या संगीताचं भुकेलं आहे त्या वरून (आता तुमची कॉलेजातली एखादी संगीता असेल तर मग तुमची महफ़ील चुकलीय. आमचं बापडं वाजणाऱ्या संगीताबद्दल चाललंय, तेंव्हा पुढलं दार बघा). आणि त्यात जर ती गझल असेल तर मग काय सांगायचंय. मन मोहरून जातं एखाद्या गझलेवर, त्यातल्या कडव्यावर .. आणि अख्खी गझल किंवा कडवं सोडाच ... अगदी एखाद्या ओळीवर देखील मन घुटमळतं ... घुटमळतं ... आणि घुटमळंत रहातं. बर्याचदा तर भन्नाट प्रयत्नांनीही ते बिचारं पुढ सरकायला तयारच होत नाही, स्वतःचं शेपुट पकडू पहाणार्या कुत्र्यासारखी अवस्था होते अक्षरशः, शेवटी शेपूट गळून पडतं, कुत्र्याचे सात जन्म पुर्ण होतात, गतजन्मात भटकत असल्यागत पण मन मात्र पुढ सरकायला तयार होत नाही. आणि मग असा तो दिवस कधी प्रसन्न तर कधी अगदी सुन्न जातो.

आजचीच गोष्ट घ्या. अथर्वचा ४था वाढदिवस साजरा केला, दिवसभर थकून आडवा झालोच होतो आणि दारावर बेल वाजली. म्हटलं कोण असेल या वेळी. नाही म्हटलं तरी रात्रीचे २ वाजलेत. अशावेळी दार तर सोडाच, पण फोनची घंटा जरी वाजली तरी दचकायला होतं. मन कावरं बावरं झालं. पण जावून दार पहाणं आवश्यक होतं. म्हणून गेलो आणि दाराची कडी किलकिली करून पाहिली ... तर खूद्द जगजीत होता. म्हटलं, बाबा रे तुला काय चित्रा न हाकललं का गालीब नकोसा झालाय म्हणून तू अशा अवेळी ईकडं तडफ़डलास. तर म्हणे, मला ऊचकी लागली, मला वाटलं तुला आठवण झाली, म्हणून आलो. आणि वेड लागल्यागत गायला लागला ... "वो कौन हैं, दुनियामे जिसे ग़म नही होता ... किस घर मे खुशी..." झालं बोंबललं ... अख्ख्या रात्रीचं खोबरं करून टाकलं. त्याचा जड आवाज ऐकतच होतो तेवढ्यात आतनं आमची लता मंगेशकर म्हणाली, "कोण आहे आता ... झोप ना प्लीज". म्हटलं "बाईगं, तू होवून जावू देत तुझी झोप, माझी उडालीय." आणि मग परत जगजीतच्या सुराशी सुर जुळवला.

"वो कौन हैं, दुनियामे जिसे ग़म नही होता, किस घर मे खुशी होती हैं मातम नहीं होता"
खल्लास. आयुष्याकडच्या सुखाच्या सगळ्या अपेक्षा गळून पडल्या. मी जगत असलेल्या या क्षणाचा अर्थच बदलून गेला. आणि मन कुठ तरी खोल रुतून बसलं. आयुष्यात नाही म्हटलं तरी सुखच सर्व काही नाहिये असं सांगणारा जगजीत माझ्या डोक्यात घुमत राहीला बराच वेळ. गौतम बुद्धांनंतर असं काही सांगणारा हाच.

"ऐसेभी हैं दुनियामे जिन्हे ग़म नही होता, इक ग़म हैं हमारा जो कभी कम नहीं होता"
ना! दुःख्ख कुणाला नसतं. अगदी सर्वांनाच असतं. पण प्रत्येकाला आपलं दुःख्ख मोठं वाटतं. "माझीच लाल" म्हणणारी मंडळी आपण, इथंही मागं हटायला तयार नसतो. तुला एक तर मला दोन, तुला दोन तर मला दहा त्रास. आरे कुणाला सांगतो तुला काय होतंय ते. इथं माझंच आणखी सरलं नाही .. चल हो बाजुला, मला जरा माझ्या दुःख्खाला वाट करू देत.

"क्या सुरमा भरी आखॊंसे आसूं नही गिरते, क्या मेहंदी लगे हाथोंसे मातम नहीं होता"


अगदी व्याकुळ झालं डोळ्यातनं अश्रु गाळायला. चटकन डोळ्यासमोर ती नवविवाहीत विधवाच आली. तीचं ते सगळं उद्वस्थ आयुष्य दिसायला लागलं आणि मन ऊद्विग्न झाल. मेहंदीने रंगलेले हात आणि रक्तानं रंगलेले डोळे ... नकोसं झालं ते चित्र ... सगळच कसं भकास दिसायला लागलं ... मनातली विलक्षण पोकळी भरायची कशानं तेच सुचेनास झालं.

"कुछ और ही होती हैं बिगडनेकी अदायें, बनने ही संवरने ही मे आलम नहीं होता"
छ्या ....! मन कुठं तयार होतं हे ऐकायला. ते मागल्याच ओळीवर अडकलं होतं. आणि माझा कुत्रा झाला होता. रात्रीच्या ३.०० ला देखील त्या विधवेच्या आयुष्याची राखण करायची जबाबदारी असल्यागत तीच्या भोवतीच फ़िरत होतं. "क्या सुरमा भरी आखॊंसे आसूं नही गिरते" ... क्यों नही गिरते, जरूर गिरते हैं. लग्नानंतर बापाचं घर सोडून जाणारी ती बाला कोण रडते. आजपर्यंतची सारी खरी खोटी नाती मागे सोडून नवीन आयुष्यात पाय ठेवायचं दिव्य करायचं म्हणजे काय सोपं नाय. अगदी अनोळखी माणसावर विश्वास ठेवून पुढल्या आयुष्याची स्वप्नं रंगवताना येणारे नको ते विचार तीच्या मनाला कोण पीळ पाडत असतील. आणि असं सुरूवातीलाच सरणाला आग द्यायची म्हणजे त्याचा दाह अंतःकरणापर्यंत पोचणारच. आयुष्याएवढं मोठ दुःख्ख ते ("आभाळा"एवढं म्हणून ते दुःख्ख लहान करण्याची हिम्मत नाहीये आपली), ते पचवायचं म्हणजे बाईचं ह्र्द़य असायला पाहीजे. आणि अशावेळी मी स्वतःला नशीबवान समजतो की पुरूषाच्या जन्माला आलो. देवाशपथ, आपल्यात ताकद नाहीये हे असं काहीतरी सहन करायची. किंवा मग कदाचित देव स्त्रीजन्म देताना ते हवं असलेलं (की नको असलेलं म्हणू) धैर्यही देत असेल.

Anyway, देव करो आणि असा ग़म दुनियात कुणालाच न देवो.

पण एक न ऊलगडलेलं कोडं म्हणजे अशा शुभ दिनी मला हे असं जगजीतने का पछाडावं. आरे मेलं तरी पुरतील इतक्या सुंदर रोमटीक गझ़ल्स आहेत, मग हेच का भोसडायचं होतं तुला ... आणि तेही इतक्या रात्री. जा ना बाबा ... चित्राकडं जा आणि तीला म्हण, "ये करे और वो करे, ऐसा करे, वैसा करे ... " .. जैसा करायचंय वैसा कर .. पण इथनं निघ... हं, निघाला बिचारा शेवटी ३.४५ ला. .... डोळे जड झालेत माझे ... कदाचीत न झोपल्यानं असतील किंवा त्या विधवेचे डोळे उतरले असतील माझ्या डोळ्यात ... थकायला झालंय. "बाय". ये परत कधीतरी. टेकतो आता.

[नोट: कुणीतरी मला "बर्याचदा" किंवा "करणार्या" हे शब्द मराठी फ़ॉन्ट मधे कसे लिहायचे त्याच key sequence सांगा रे प्लीज. या "र" आणि "य" च लग्न मला लावताच येईना झालंय]

Friday, June 1, 2007

४ वर्षाचा सवाल!

अथर्वसोबत आजकाल काही बोलायचं म्हणजे मला भ्यायला होतं. बोलणं कमी आणि ऐकणं जास्ती आणि त्याहीपेक्षा जास्त विचार करायला लागणं. आमचा हा पहिलाच पराक्रम असल्यानं आणखी सवय झाली नाही. हो, ४ वर्ष झाली पण आत्तादेखील असं वाटतं हे कार्टं अजून नविनंच आहे. चेहरा आणि आवाज सोडला तर बाकी काही ओळखीचं नाही असं वाटतं. रोज काहीतरी नवंच रूप, नवा विषय, नवा प्रश्न.

अगदी परवाचीच गोष्ट. डिनर टेबलवर आमची हॅप्पी फ़ॅमीली (म्हणजे चिरंजीव, विजू आणि मी) "गिळायला" बसली होती. "गिळायला" हा शब्द महत्वाचा कारण जेवणाकडं कमी आणि गिळण्याकडंच जास्ती लक्ष होतं. बायकोनं परत आम्हाला गिनिपीग बनवायच्या ऊद्देशानं काहीतरी नविन पदार्थ ताटात टाकला होता. (खरंतर "विक्षीप्त" किंवा "विचीत्र" म्हणावसं वाटतंय, पण लहाणपनापासनं मातोश्रींनी शिकवलंय "जेवणाला नावं ठेवू नयेत" .. म्हणून संयम ठेवून "नविन" म्हणंण आलं) तेंव्हा "कसं झालंय" हा अतिशय प्रिय (यातला "तिशय" silent) प्रश्न कानावर पडण्याआधी ताटातलं पोटात टाकून आपला computer घेवून बसावा हा ऊद्देश. पण जे नशिबात लिहून आलंय ते टाळंणं का माणसाच्या हातात आहे (बायकांच्या असेल कदाचित). पोटातला अग्नी जरासा थंड पडला होता तेवढ्यात खडा सवाल, अगदी प्रेमळ आवाजात कानावर धाडकन येवून आदळला - "आवडलं?". (नेमक्या अशाच वेळी कसा तीला आवाज प्रेमळ काढता येतो हेच मला कळंत नाही. बाकीवेळा कानाची ओंजळ करून जरी वाट पाहिली तरी आवाज थोडादेखील प्रेमळ निघत नाही. anyway, तो एकूण वेगळाच विषय आहे). हं, तर प्रश्न येवून आदळला ... आणि घशातला घास घशात, हातातला हातात आणि ताटातलं सगळं घशात घुसल्यासारखं वाटलं. पण हे expected आणि सवयीचं असल्यानं पटकन "हं हं" असं तोंडातून निघून गेलं. पण जसा मला प्रश्न सवयीचा, तसंच तीला ऊत्तर आणि त्यात ती हुशार, समजून गेली आणि पुढलं जेवण काय hot होतं म्हणून सांगू. जावू देत, माझ्या सार्या उपवर मित्रांना हे माहितीच असेल. असा विषय सोडून जायची माझी किंचीतही इच्छा नव्हती, पण "बायको" म्हटलं की नेहमीच विषयाला सोडून असतं ... असो ...

हं तर डिनर टेबलवर हे महाभारत चालू होतं आणि बाळराजे "मात्रुभाषे"त वदले ... "daddu, where did I come from". (आमचे सुपूत्र आम्हाला "daddu" म्हणून संबोधतात .. daddy नाही की dad नाही ... कुठून शिकले माहिती नाही ... पण daddu. anyway स्वतःच्या पोरान काही म्हटलं तरी छानच वाटतं. तरी ऊगीच नाही म्हणाले थोर - आपला तो बाबल्या आणि दुसर्याचं ते कार्ट). मग आम्हाला ते विचार करण आलं. घास चावता चावता डोकं खाजवणं चालू होतं ... पण अशा प्रश्नांची सरळ ऊत्तरं देणं आवश्यक आहे नाहीतर पुढे चालून महागात पडतं म्हणे. आणि मी म्हटलं "मम्माच्या पोटातून". वाटलं नेहमीप्रमाणे "ओह!" असा उद्गार बाहेत पडेल आणि थंड पडतील .. कसलं आलंय ... लगेच एक सवाल ... "i am so big,
mumma's tummy is so small ... how did I fit in there". आणि मग दुसरं सत्र डोकं खाजवायचं आणि उत्तराचं. मग बरेचसे "why / how / when" झाले ... माय आणि बाप कुतुहलानं पोराच्या प्रश्नाची ऊत्तरं देत राहीले ... आणि या सगळ्यात एक फ़ावलं ... बायकोच "आवडलं का?" विरघळून गेलं.

बरं आमचेच साहेब हुशार आहेत असंही नाही. बहूतेक वर्षे ३-५ हा वयोगटच मुळात जिद्न्यासू असतो. माझ्या एका मैत्रीणीच्या घरी तीच्या बहिणीसाठी स्थळ पहाण्याचा विषय चर्चेत होता. तीचा ४ वर्षाचा पोरटा सगळं कसं मन लावून ऐकत होता आणि मधेच मुंगी चावल्यागत ओरडला ... "आई, बाबानी कुणाशी लग्न केलं गं". तीनं अगदी गालावर पापा देवून, हसून ऊत्तर दिलं "माझ्याशी". पण पुढं जे ऐकायला मिळालं ते कदाचीन कुणाही प्रौढ व्यक्तीच्या विचारशक्तीच्या बाहेरचं होतं .... "वेडेच आहेत बाबा ... घरातच लग्न केलं. नाहितर मावशी बघ कशी बाहेत करतेय." झालं. अख्ख्या घरात हशा.
हेच नग एके दिवशी आईला, "आई याला काय म्हणतात गं?" आईनं तत्परतेनं सांगीतलं, "पापण्या". "कशाला असतात त्या?" लगेच दुसरा प्रश्न." आईनं त्याच तत्परतेनं सांगीतलं, "डोळ्यात काही जावू नये म्हणून". या ऊपर काय म्हणाले असतील महाशय? "काही उपयोग नाहीये त्यांचा. डोळ्यात काही जावू नये म्हणून असतील तर मग अशा बाहेर कशाला आहेत ... खाली पाहीजेत ना ...". झालं. बिचारी आई खर्या अर्थानं अबला होवून निरूत्तर. पण त्या दिवसाआधी त्या आईला पापण्यांचा आकार कधीही जाणवला देखील नसेल.

असंच एका शुक्रवारच्या रात्री मी आणि विजू बोलत बसलो होतो. विषय होता "विकेंडला काय करायचं". इथं अमेरीकेत हा एक सर्वात मोठा प्रश्न. आरे २ दिवसांचा विकेंड तो. पण माणसं सोमवारपासनं शुक्रवार पर्यंत तेच ठरवतात ... "विकेंडला काय करायचं". तसं म्हटलं तर नुसतं झोपून राहीलं तरी २४ तास असेच कटतील. पण बायको म्हटलं की एक तर झोपू देणार नाही, जागेपणी आपल्याला जे करायचंय ते करू देणार नाही आणि तर अर्ध्या तासाला खेटेल "सांग ना काय करायचं ऊद्या?" तर अशा या महाबिकट विषयावर आमचं debate चाललेलं. मी विचारा आठवडाभर काम करून ("काम करून" बायकोसाठी, खरंतर स्वतःला बिझी ठेवून जास्ती) थकलेला, म्हटलं "आराम करू. बरेच दिवस झाले चांगली झोप नाही झाली". झालं भडकली. "तुला तर आराम करण्याशिवाय काही सुचतंच नाही. काढ नुसत्या झोपा. त्याच्यासाठीच लग्न केलंस. आठवडाभर ही घरी आणि विकेंडला ही घरीच ठेव". मला माझी चूक कळली (किंवा कळविण्यात आली) .. आणि मी काही बोलायच्या आधीच आमजे हिरो बोलले, "mumma, you dont like daddu, then why did you marry him. Why don't you marry me". बरं झालं बोलले ... पुढलं महायुद्ध टळलं आणि विषय हलका झाला. "करते रे बाळा तुझ्याशीच करते पुढल्यावेळी" असं काहीतरी गोजिरवाणं बोलून जवळ घेतलं त्याला. मी म्हटलं, "बाईगं, त्याला जीतका जवळ घेतेस तीतका मला ही घे. विकेंड काय रोज फ़िरवीन" आणि हसण्यात वेळ मारून नेली.

तर असे एक आणि कितीतरी प्रश्न रोज माय-बापांना भंडावून सोडतात. पण एक मात्र खरं. असले ४ वर्षाचे सवाल माझ्यासाठी मात्र वरदान असल्यासारखेच असतात. प्रत्येक वेळा माझी सुटका करतात. म्हणून हिला बोलायचं झालं की मी त्याला जवळ घेवून बसतो. आपलं शस्त्र तयार असलेलं बरं, नाहितर गळा कापला जायचा एखादेवेळी गाफिलपणे.

म्हणून अथर्वला म्हणाव वाटतं ... बोल रे माझ्या राजा.... तू असाच बोलंत रहा.