Monday, July 21, 2014

मानवी मनाचं लाकडी खोकं

"नचिकेताचे उपाख्यान" ... माझ्या अतिशय निवडक पुस्तकांपैकी एक आवडतं पुस्तक. किती तरी असे प्रसंग तो नचिकेत सांगतो जे जनसामान्यांना कधी पटणारच नाहीत. पण आपल्या तुसड्या विचारांचं कुंपण सोडून ज...रा पल्याड पाहीलं तर तेच त्याचे विचार भव्य आणि पुढारलेले वाटू लागतात. कधी कधी वाटतं हे पुस्तक त्याच्या काळाच्या पुढे होतं की काय ... की काळंच याच्या मागे होता.

असंच एके ठिकाणी "तू एकाच वेळी असं एका पेक्षा जास्ती स्त्रियांवर कसा प्रेम करू शकतो आणि तेही एकिवरही अन्याय न करता" या त्याच्या मित्राच्या प्रश्नाचं उत्तर देताना हा नचिकेत काय बोलून जातो. "मानवी मन म्हणजे काही लाकडी खोकं नाही की आत कुणीतरी पहिले आहे म्हणून दुसरा कुणी आत येऊच शकत नाही". या विचारसरणीला आव्हान द्यायची ताकद माझ्या विचारात नव्हती तेंव्हा.

पण परवा असाच एका मित्रासोबत बोलत बसलो असता नेमका हाच प्रश्न समोर आला. खरंच मानवी मन हे लाकडी खोकं नाही का? खरंच ते इतकं लवचिक आहे का की एकाच वेळी एकाच जागी एकाच तिव्रतेने एका पेक्षा जास्त लोकांना सामावून घेवू शकेल? कि हा फक्त न कळत्या मनाचा खेळ?

बोलता बोलता मी बोलून गेलो, "मन शेवटी खोकंच. एका वेळी एका स्थानी एकच व्यक्ती सामावणारं खोकं. पण ज्या अर्थी एखाद्याच्या मनात एकाच वेळी एकाच नात्यावर - खास करून स्त्री आणि पुरूष प्रेमाच्या नात्यावर - एकापेक्षा जास्त व्यक्ती स्थानापन्न होतात त्या वेळी कुठंतरी जाणते-अजाणते पणाने पहिल्या व्यक्तीने ऊठून दुसर्‍या माणसासाठी जागा करून दिलेली असते. अन्यथा त्या दुसर्‍या व्यक्तीला दारात थांबण्या खेरीज पर्याय नसता."

बिचारा मित्र ... एकदमच शांत झाला. पण त्याच्या डोळ्याच्या पाणावलेल्या कडा सगळं सांगून गेल्या.

नचिकेता ... कसा रे तू असा.... बिनधास्त ... दिलखुलास. तुला खरंच असं जगता येतं की तू फक्त पुस्तकाच्या पानावरलाच हिरो. तत्वज्ञानातच जगणारा .... बाकी आम्ही सगळे आयुष्याची भरंड साध्या माणसासारखी सोसून संपणारे.

1 comment:

Anonymous said...

Uff...🥺